Friday, April 15, 2022

विजय सेथुपथीचा आयुष्य जगायला शिकवणारा चित्रपट Kadaisi Vivasayi review marathi

काडीसी विवासायी.. नावाचा एक सुंदर आणि अर्थपूर्ण चित्रपट बघण्यात आला.. एखादी पाण्याची नदी जशी संथ वाहावी कोणतीही अडचण तिच्या आड येऊ नये.. तीने सतत आणि सतत वाहत राहावं.. वाहतच राहावं.. अगदी वाटेत येणाऱ्या ओढ्यांना आणि नाल्यांना सामावून न घेता..कारण आजच्या जगात त्या नितळ नदीच चारित्र्य खराब करण्याची ताकद ते छोटे ओढे आणि नाल्या ठेवतात.. तसाच काहीसा या चित्रपटाचा अर्थ आहे.. शेवटचा शेतकरी असं या चित्रपटाचं मराठीतलं नाव.. आपल्या मराठीत एक म्हण आहे शेती असणं आणि शेती कसंन यात फरक आहे.. अगदी जमीन आणि अस्मानाचा फरक आहे.. शेतीतील आत्मा हा व्यवसायात गेला, शेती सुद्धा एक हक्काचा व्यवसाय झाला म्हणून शुद्ध अंतकरणाने शेती करणारे शेतकरी आज किती आहेत? चित्रपटात सुद्धा गावात एकच  शेतकरी असतो ज्याचा, धर्म शेती, कर्म शेती आणि वर्ण सुद्धा शेतीचं असतो.. वयाची 80 गाठलेली असते पण शेतीची आस आणि कास काही सुटलेली नसते, शेती ही गरज म्हणून चित्रपटातील पात्र करत नाही तर जबाबदारी म्हणून शेती तो व्यक्ती कसत असतो.. निसर्ग हा आपला पोशिंदा आहे पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या बाबतीत तो भेद करत नाही, शेतीसाठी लागणार सूर्यप्रकाश आणि पाणी तर निसर्ग देतो मग आज आपला

 अट्टहास नेमका चाललाय कुणासाठी? निसर्ग तुमची गरज पूर्ण करू शकतो हाव नाही या वाक्याचा प्रत्यय नेहमी चित्रपट बघताना येत असतो, मुख्य पात्राच्या चेहऱ्यावर कमालीची अध्यात्मिक शांतता असते, जणू काही मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरीमोठं राज्य उभे करून त्याचा राज्यकारभार तो वृद्ध व्यक्ती करत असावा इतके आतून आणि बाहेरून स्थिरभाव त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर असतात.. जर कर्मवादी बनून आयुष्यात स्थिरता आणि समाधान मिळत असेल तर यशस्वी होण्याचे काही मंत्र जाणून घेण्याची गरज आहे का? कदाचित यशस्वी होणे ही झुंडीची मानसिकता झाली आहे की काय असे वाटत आहे, सामाजिक दडपण, बदलते जग, ढासळती नैतिकता माणसाला अधिक वेगवान आणि निष्ठुर करत आहे.. जी लोक ह्या सगळ्यांपासून लांब आहेत ती स्वतःजवळ

 आहेत, आपण आणि आपले अस्तित्व ते बहुदा आपल्यापेक्षा चांगलं जाणत असावेत.. रस्त्यात अपघातात पडलेल्या लोकांना आपण उचलण्याचे कष्ट घेत नाही.. पण चित्रपटातील पात्र मात्र मेलेल्या मोरांचा अंत्यसंस्कार करून चुकीच्या आरोपात जेलमध्ये जाते.. त्याला हे माहीतच नसते की हल्ली प्राण्यांना आणि लोकांना मदत करण्याची पण क्षिशा भेटते.. जेव्हा जज त्या व्यक्तीला विचारतात की तुम्ही मोरांना मारले का? ते म्हणतात ,मोर आमच्या दैवताचे वाहन आहेत(मुरुगण)आम्ही त्यांची पूजा करतो अन त्यांना हानी कशी पोहचवू? हा निर्दोष सुटण्याचा पुरावा जरी नसला, पण माणूस असल्याचा पुरावा नक्कीच आजच्या जगात आहे..विजयने या चित्रपटात एका वेडसर माणसाची भूमिका साकारली आहे.. जो सतत देवाचा दाखला देत असतो.. त्याच्या भूमिकेचे आकलन मला करता आले नाही.. तुम्हाला करता आले तर नक्की करा.. आणि हा चित्रपट नक्की बघा..

No comments:

Post a Comment

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...